Monday, 2 October 2017

थापू महाराज

थापू महाराज

थापा मारणे हा मनुष्यस्वभाव आहे हे एकवेळ मान्य केले तरि त्या किती माराव्यात याला काही प्रमाण,तारतम्य नको काय? बरं त्या पचतील अशा तरि आसाव्यात की नको?
        अशा थापाड्या लोकांत थापूगुरू अग्रेसर असतात.त्यांनी मारलेल्या थापा म्हणजे ब्रह्मवाक्य समजून थापूभक्तगण मिरवत असतात.गुरमीत थापूंच्या मारलेल्या थापांना त्याला अटक होताच भक्तांनी फोटोंसहीत जलसमाधी दिली.
           पंचवीस वर्षापूर्वी डहाणू पंचक्रोशीत संपूर्णानंदनामक एक थापू अवतरले होते.त्यांनी काय थापा मारल्या तर म्हणे हिमालयात चाळीस वर्षे एका पायावर उभे राहून त्यांनी तप केले होते.कितीतरी धनीकांनी देऊ केलेल्या मर्सिडिज गाड्या त्यांनी नाकारल्या होत्या. आपल्याकडची महागडी सफरचंद म्हणे त्यांच्या मुलखात झाडाखाली पथारा पडत असे तरि बांडा कुत्रा पण खात नसे. अशा थापू महाराजाच्या नादी लागून वरोरच्या नूतन विद्यामंदीर हायस्कूलचे तत्कालीन हेडमास्तर शेटेसर स्वतः भर रस्त्यावर त्याचे पाय धरत व विद्यार्थीही कित्ता गिरवीत.बाया बापुड्यांना नादी लावून अनर्थ घडण्याआधीच जागृत मच्छीमार तरूणांनी त्याला हाकलून दिले.
‌        थापू महाराज कसे अवतरतात? हा एक प्रश्न बहुजनाना पडतो. उपरोक्त संपूर्णनंदाच्या वरोर मुक्कामी खंडेराव नावाचा तांबारलेल्या डोळ्याचा,
‌विस्कटलेल्या केसाचा एक इसम आला होता.मुंबईला
धारावी भागात केलेल्या गुन्हेगारी कृत्याचा पश्चाताप होऊन पाप विमोचनार्थ तो गुरुच्या शोधात वरोरला पोचला होता.
थापू महाराजांनी त्याला कानमंत्र देऊन शिष्य केले. पुढे संपूर्णानंदाच्या गच्छंतीनंतर हा खंडेराव कुंभोली महाराज म्हणून उदयाला आला व काही कालावधीत त्याचा अस्तही झाला.
           नदीचे मूळ व साधूचे कूळ पाहू नये अशी मान्यता असल्यामुळे भाबडे समस्याग्रस्त लोक अशा फेकू थापू बाबांच्या जाळ्यात अडकतात.अडाणीलोक तर सोडाच पण शिकलेसवरले लोक जेव्हा अशा थापू बुवांच्या दरबारी दाखल होतात तेव्हा खरे आश्चर्य वाटते.हे लोक का स्वतःला प्रश्न करित नाहीत? अरे चार चौघासारखाच संसारी तलाठी भ्रष्टाचारी म्हणून निलंबित होतो काय आणि नंतर अशी काय सिद्धी  प्राप्त करतो की जगतगुरू म्हणून डंका पिटतो व भले भले या तुंदीलतनु थापू महाराजाच्या भजनी लागतात.अरे कोणत्या विद्यापीठाने यांना जगद्गुरू पदवी कशाच्या आधारावर दिली?याची शहानिशा या तथाकथित अनुयायांनी केली असती तर
थापू महाराजांचे प्रस्थ माजले नसते.
            व्यक्तीपूजेचे खूप मोठे गारुड भारतीय मनावर आहे.त्यामुळेच दोन आण्याच्या संमोहन विद्येच्या आधारे थापू महाराज कमकुवत मनाच्या लोकावर अशी मोहिनी घालतात. ऐकीव खोट्या थापा खर्या म्हणून बोलबाला करून थापू बुवांचे बैठकीचे पहिले मानकरी खोटा प्रचार करतात व गणसंख्या वाढत जाते.अशाप्रकारे थापू महाराजांचा महिमा वधारतो.मठ स्थापन होतात व फुकटच्या थापा विकल्या जातात.महाराजांची दुकाने जोरात चालतात.
                कोल्हापूरमध्ये राजकारणी लोकांना गंडे बांधणारा एक थापू महाराज प्रसिद्ध  आहे.राजकारण्यांचे अचूक भविष्य वर्तवणारा अशी ख्याती आहे म्हणे या थापूची.त्यामुळे निवडणुकीच्या समयास या थापू महाराजाचे उंबरठे झिजवताना माहीर राजकीय नेते आढळतात.तसे राजकारणी व बाबाबुवांचे आर्थिक साटेलोटे असतात हे आजकालचे शेंबडे पोरही जाणते.
देवदानवा नरे निर्मिले पण आजच्या ढोंगीसोंगाड्यांनी स्वयेचि स्वघोषित संत वदविले.गोलमोल थापा मारून
थापू महाराज बायांना वश करतात.वशिकरण विद्या त्यांनी चांगली अवगत केलेली असते.या वशिकरण मोहजालात फसलेल्या स्रियांना थापू महाराज गंडा बांधून पार गंडवतात.अतएव सावधान सर्वथा.
           थापा मारून घडतो थापू महाराज जगताचा
           विचारी मना संग नको बा अशा भामट्याचा
.
.       हेमंतराम  पाटील. (वरोरकर)
मो.- 9757340310.
B-201, त्रिवेणीसंगम, तावडे संकुल,
एल.टी.रोड.,दहिसर(प.).मुंबई 400068.

No comments:

Post a Comment